पुणे : ‘विविध वयोगटानुसार शरीरासोबत बुद्धीचीदेखील वाढ होते. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकू नयेत, त्यांच्यावर निर्णय लादू नयेत. त्यांच्या क्षमता ओळखून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे,’ असे मत बाल-मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर त्या बोलत होत्या. मयूर कॉलनीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. उपस्थित होते.
डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, ‘शरीरासोबत मेंदूचीदेखील वाढ होत असते आणि सर्वांत जास्त स्ट्रेस हा लहान वयोगटात आढळून येतो. त्यामुळे विनाकारण त्यांच्यावर निर्णय लादल्याने किंवा त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदारी टाकल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागते. म्हणून पालकांनीदेखील काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या बुद्धीनुसार वाढण्यास मदत करणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूत ‘कॉर्टिसोल’ नावाचे रसायन असते, जे ताण निर्माण करते. तसेच ‘सेरेटोनीन’, ‘इंडोफिन’, ‘ऑक्सिडीसीन’, आणि ‘ट्रियुन’ ही चार आनंदी ठेवणारी रसायनेदेखील असतात. त्यामुळे कॉर्टिसोलऐवजी इतर चार रसायनांच्या वाढीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मुलांच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्यावर काम केले पाहिजे. मुले लवकरात लवकर मोठी होण्यापेक्षा, योग्य पद्धतीने कशी वाढतील या गोष्टीवर भर दिला पाहिजे.’
विनय र. र. यांनीही मनोगत व्यक्त केले.